महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजना
कर्जाची रक्कम शेतक-यांच्या खात्यात जमा
8 हजार शेतक-यांना व्याज सवलतीचा लाभ
वर्धा, दि. 18 (जिमाका) : शेतक-यांच्या डोक्यावरील कर्जाचा भार कमी करुन त्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना सुरु केली आहे. या योजनेंतर्गत बँकांनी पोर्टलवर नावे अपलोड केलेल्या 53 हजार 212 शेतक-यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात आला आहे.
गेल्या काही वर्षात नापीकी, कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळ यासह वेगवेगळया संकटांना शेतक-यांना समोर जावे लागले. यामुळे हवालदील झालेल्या शेतक-यांना दिलासा देण्यासाठी शासनाने महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची घोषणा डिसेंबर 2019 मध्ये केली होती. जिल्हयात या योजनेच्या अटी व शर्तीस पात्र ठरणा-या शेतक-यांची नावे ऑनलाईन अपलोड करण्याच्या सूचना सर्व बँकांना करण्यात आल्या होत्या.
बँकांनी अपलोड केलेल्या 54 हजार 793 खातेदार शेतक-यांचे आधार प्रमाणिकरणाकरीता पोर्टल उपलब्ध झाले होते. यापैकी आधार प्रमाणिकरण प्रक्रीया पुर्ण झालेल्या 53 हजार 212 शेतक-यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात आला आहे. कर्जमाफीची ही रक्कम 470 कोटी रुपये इतकी असून ही रक्कम राज्य शासनाच्या वतीने शेतक-यांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे. आता केवळ 1 हजार 122 खात्यांचे आधार प्रमाणिकरण शिल्लक असून प्रमाणिकरणाची कारवाही सुरु आहे.
शासनाने शेतक-यांना दिलासा देण्यासाठी सुरु केलेल्या या योजनेचा लाभ सर्व पात्र लाभार्थ्यांना देण्यात यावा. उर्वरीत लाभार्थ्यांचे आधार प्रमाणिकरणाची मोहिम मोठया प्रमाणावर हाती घेऊन शिल्लक लाभार्थी सुध्दा योजने अंतर्गत समाविष्ठ करुन घेण्यात यावे. या योजनेचे जिल्हयात शंभर टक्के काम होणे आवश्यक आहे, असे निर्देश जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी सबंधित विभागाच्या अधिका-यांना दिले.
8 हजार शेतक-यांना व्याज सवलत
राष्ट्रीयकृत, ग्रामीण व खाजगी बँकांकडून पिककर्ज घेऊन मुदतीत परतफेड करणा-यांना शासनाच्या वतीने कर्जावरील व्याजात सवलत दिली जाते. जिल्हयात सन 2021-22 या आर्थिक वर्षात मार्च 22 अखेर घेतलेल्या कर्जाची मुदतीत परतफेड करणा-या 8 हजार शेतक-यांना 1 कोटी 85 लाख रुपयांची व्याज सवलत देण्यात आली आहे.