Ø 2 मे पासून मिळणार कोरोनावरील लस
Ø पुर्व नोंदणी ( रजिस्ट्रेशन) करणे बंधनकारक
Ø 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे जिल्ह्यातील 7 केंद्रावर होणार लसीकरण
Ø प्रत्येक केंद्रावर दररोज 200 डोज देणार
Ø स्पॉट रजिस्ट्रेशन ची सोय नसल्याने केंद्रावर गर्दी करू नये
Ø पालकमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा
बल्लारपूर ( राजू वानखेडे: तालुका प्रतिनिधि)
चंद्रपूर जिल्ह्यात १८ ते ४४ वर्ष वयोगटातील नागरीकांना कोरोना आजारावरील कोविशिल्ड ही लस दिनांक ०२ मे २०२१ पासून सात केंद्रावर प्रायोगिक तत्वावर देण्याचे नियोजन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आलेले आहे. तरी नागरिकांनी या ठिकाणी जाऊन लस घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.
या ठिकाणी मिळेल लस:
प्राथमिक शाळा, पोलिस स्टेशन समोर, ब्रम्हपूरी, रामचंद्र हिंदी प्राथमिक शाळा, रामनगर, चंद्रपूर, पंजाबी सेवा समिती, तुकुम, चंद्रपूर, नाट्य सभागृह, बल्लारपूर, समाज मंदीर रामनगर राजुरा, बुद्ध लेणी विजासन भद्रावती, जनता कन्या विद्यालय, नागभिड या केंद्रांवर ऑनलाईन नोंदणी करणाऱ्या १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना कोविशिल्ड लस देण्यात येईल. दर दिवशी २०० याप्रमाणे प्रत्येक केंद्रावर लसीकरण करण्यात येणार आहे.
कोविन अॅपवर नोंद केल्यानंतर जवळच्या १८ ते ४४ वर्षासाठी राखीव असलेल्या लसीकरण केंद्रावरच लस दिल्या जाईल. सर्व केंद्रावर पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध असल्याने नागरीकांनी गर्दी करु नये. ज्या नागरीकांना लसीकरण सत्र उपलब्ध झाले आहे त्याच नागरीकांनी लसीकरणासाठी यावे. सदर केंद्रावर स्पॉट रजिस्ट्रेशन ची सोय नसल्याने केंद्रावर जावून गर्दी करु नये.
१८ ते ४४ वयोगटातील लसीकरण केंद्र राखीव असल्याने इतर वयोगटातील नागरीकांनी लसीकरण केंद्रावर जावून लसीकरणासाठी आग्रह करु नये. संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने करण्यात येत असल्याने केंद्रावर विनाकारण
गर्दी न करता लसीकरण करणा-या टिमला सहकार्य करावे. सदर राखीव लसीकरण केंद्रावर ४५ वर्षे व त्यापुढील वयोगटातील नागरीकांना लस दिल्या जाणार नसल्याने या वयोगटातील नागरीकांनी लसीकरण केंद्रावर जावून लसीकरणाचा आग्रह धरु नये असे जिल्हा प्रशासनामार्फत सूचित करण्यात आलेले आहे.
पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिल्या शुभेच्छा
महाराष्ट्र शासनाने 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना मोफत लस देण्याचा निर्णय घेतला असून लसच्या उपलब्धतेनुसार सर्वांचे लसिकरण करण्यात येईल. जिल्ह्यात सुरू होणाऱ्या या लसीकरण मोहिमेला माझ्या शुभेच्छा आहेत. मी
आज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे लस घेतली आहे, आपणही लस घ्यावी. लस सुरक्षित व प्रभावी असून कोरोना विरोधातील लढ्यात एक मोठं शस्त्र आहे. त्यामुळे शहरी तसेच ग्रामीण भागातील नागरिकांनी उस्फूर्तपणे सामोरे येऊन लस टोचून घ्यावी असे आवाहन पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले आहे.
लस घेतल्यावरही नागरिकांनी वारंवार हात धुणे, मास्क लावणे व सुरक्षित अंतर पाळणे आवश्यक आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.