आदिम कोलामांच्या ढोलांचा आवाज सरकारच्या कानापर्यंत पोहोचेल का  स्वातंत्र्याच्या इतिहासात माणिकगडवरील कोलामांचे पहिलेवहिले ‘ढोल सत्याग्रह’

 

राजुरा, ता.15 : माणिकगड पहाडावर गर्द जंगलात आणि जंगली श्वापदाच्या सानिध्यात अनेक पिढ्यांपासून वास्तव्य करून गुजरान करणा-या कोलामांना आपल्या वास्तव्याचे प्रमाण मागीतले जात आहे. सरकार त्यांच्या योजना अडवून बसले आहे. शासकीय यंत्रणेने जंगलात जाऊन त्यांची वेळीच नोंद घेतली असती तर आज पुरावा मागण्याची वेळच आली नसती. आदिम कोलामांच्या शोषणाला शासनव्यवस्थाच जबाबदार असून, त्यांच्या गुड्यावरील दुरावस्थेचा हिशोब मांडण्यासाठी आज ( ता. 15) राजुरा येथे आदिम समुदायाने ढोल सत्याग्रह केले. कोलामांचे पारंपारीक वाद्य असलेल्या ढोलांचा आवाज सरकारच्या कानापर्यंत पोहोचून कोलामांना न्याय मिळेल का ? असा सवाल कोलाम विकास फाऊंडेशनचे अध्यक्ष विकास कुंभारे यांनी उपस्थीत केला आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यासह कोरपना व राजुरा येथील आदिम कोलाम समुदायाचे ढोल सत्याग्रह आंदोलन कोलाम विकास फाऊंडेशनचे अध्यक्ष विकास कुंभारे यांचे नेत्रुत्वात करण्यात आले. राजुरा येथील भवानी मातेचे पुजन करून हजारो कोलाम ढोल वाजवित उपविभागीय कार्यालयावर धडकले. ढोलाच्या तालावर थीरकणारे पावले अन् आपल्या परंपरेला साजेसे लाल-पांढरे झेंडे, पुजेचे सामान असलेले वडगे घेतलेला कोलामांचा जत्था पाहतांना राजुरा वासिय दंग झाले. आदिम कोलामांना संपुर्ण संरक्षण मिळावे, विनाअट वनजमीनीचे पट्टे देण्यात यावे, कोलामगुड्यावर तातडीने मुलभूत सोयी सुविधा बहाल करण्यात याव्यात, गेल्या दहा वर्षात बांधण्यात आलेल्या घरकुल व शौचालय बांधकामाची उच्च स्तरीय चौकशी करण्यात यावी यासह खावटी अनुदान, उत्तम शिक्षण व आरोग्य अशा अनेक मागण्यांचे निवेदन शासनाला पाठविण्यात आले. उपस्थित जनसमुदायास मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी माजी आमदार अँड. वामनराव चटप यांनी कोलामांचा लढा सरकारच्या डोळ्यात झनझणीत अंजन घालणारे असून, स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षानंतरही हा समाज विकासाच्या मुख्य प्रवाहाशी जोडल्या गेलेला नाही यातच शासन प्रशासनाचा पराभव आहे. सरकारने जागे होऊन कोलामांना तातडीने न्याय मिळवून द्यावा असे आवाहन त्यांनी केले. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष पुजू कोडापे, सचीव मारोती सिडाम, नानाजी मडावी, वाघूजी गेडाम वअन्य सहका-यांनी मार्गदर्शन केले.